चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपमुळे साताऱ्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांची झोप उडाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:05 IST2018-12-21T23:04:28+5:302018-12-21T23:05:06+5:30
उंब्रज : ‘कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांमध्ये विरोधकांना भारतीय जनता पक्षाने काहीही शिल्लक ठेवले नाही. आता सातारा जिल्ह्यात खिंडार पाडले आहे. ...

चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपमुळे साताऱ्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांची झोप उडाली
उंब्रज : ‘कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांमध्ये विरोधकांना भारतीय जनता पक्षाने काहीही शिल्लक ठेवले नाही. आता सातारा जिल्ह्यात खिंडार पाडले आहे. प्रवेश करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते घाबरले आहेत. त्यांच्या झोपा उडाल्या आहेत,’ असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
उंब्रज, ता. कºहाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कºहाड तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष महेशकुमार जाधव यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
महसूलमंत्री पाटील पुढे म्हणाले, ‘उंब्रजमध्ये तहसील विभागाच्या उपकार्यालयाचा प्रस्ताव लवकरच मंजूर करून येथे उपकार्यालय सुरू करण्यात येईल. नगरपंचायत ही लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजूर करण्यात येईल. भाजप हा पक्ष सर्वसामान्यांचे काम करणारा पक्ष असल्यामुळे या पक्षात प्रवेश करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. महेशकुमार जाधव यांना त्याच्या कर्तृत्वानुसार लवकर पक्षामध्ये, सरकारमध्ये जबाबदारी दिली जाईल. मराठा आरक्षण, सिंचन योजना, जलयुक्त शिवार योजना यासह अनेक योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना सुखी ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे भाजप सर्वसामान्यांच्यात लोकप्रिय होत चालली आहे.’